मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर चांगल्याच आक्रमक झालेल्या कंगना राणौत व शिवसेनेमध्ये शाब्दिक लढाई जुंपली आहे. त्यात कंगनाने संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पीओकेशी केल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा समोर आला आहे. दरम्यान दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू होते. तर कलाकारांसह अनेक राजकीय नेत्यांनीही या वादावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या वादावर आपली प्रतिक्रिया दिली असून, मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे सांगत त्यांनी कंगना राणौत हिची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली आहे.
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादावर अमृता फडणवीस यांनी कुणाचेही नाव न घेता ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणतात की, ‘आपण एखाद्याच्या मताशी सहमत असू शकत नाही. मात्र तरीही आपण लोकशाहीने दिलेल्या मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचा मान राखला पाहिजे. बोलण्याचे, व्यक्त होण्याचे, चळवळ करण्याचे आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याच्या मताशी असहमत असाल तर त्याला प्रतिवाद करा. पण म्हणून विरोधी मत व्यक्त करणा-याच्या पोस्टरला चपलांनी मारणे हे काही योग्य नाही.’ असे त्यांनी म्हटले आहे.

No comments:
Post a Comment