मुंबई, दि. २ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ४७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १ सप्टेंबर या कालावधीत कलम १८८ नुसार २,४७,०६६ गुन्हे नोंद झाले असून ३४,३३८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी २३ कोटी ५९ लाख ७६ हजार ३६४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ८ लाख १८ हजार २३२ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.
कडक कारवाई
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दृष्टप्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३४९ घटना घडल्या. त्यात ८९२ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
१०० नंबर वर १ लाख ११ हजार फोन
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १,११,३३१ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८२९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले, अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ९६,११८ वाहने जप्त करण्यात आली.

No comments:
Post a Comment