मुंबई, दि. 15 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी विशेष आमंत्रित कोविड योद्धे, डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते. "डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोराना योद्धे आहेत" अशा भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. यावेळी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि उच्च स्तरीय अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकर ही उपस्थित होते.
कोरोनाच्या कालावधीत पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आपले काम चोखपणे बजावले. पण हे करताना काही पोलिस अधिकारी व कर्मचारी ही कोरोनाला बळी पडले. त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना देखील त्यांनी अभिवादन केले.
आपल्याला शाळा सुरू करता नाही आल्या. पण आपण राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील याची काळजी घेतली. ऑनलाइन शिक्षण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्यात आज घडीला अंदाजे 60 हजार उद्योग सुरू झाले आहेत. 16 लाखांहून अधिक कामगार आणि कर्मचारी वर्ग कामावर परतला आहे. स्थानिकांना मराठी माणसाला रोजगार मिळावा म्हणून शासनाने 'महा जॉब्ज' पोर्टल सुरू केले. मोबाईल ॲपही सुरू झाले आहे. सर्वसामान्यांना घरे मिळावीत यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू करणार.
देशात प्रथमच असा तज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला. जिल्ह्यातील डॉक्टरांचे सुद्धा टास्क फोर्स तयार केले. गावोगावी कोरोना ग्राम दक्षता समित्या तयार करून गावकरी आणि लोकांवरही जबाबदारी टाकण्यात आली.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सुमारे 30 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. साडेचार कोटी लिटर दुधाचे रूपांतर भुकटीत केले. आदिवासी मुले व महिलांना ही दूध भुकटी मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मागील दहा वर्षात झाली नाही एवढी विक्रमी म्हणजे 418 लाख क्विंटल कापूस खरेदी शासनाने या वर्षी केली.

No comments:
Post a Comment