नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कचरामुक्त भारत अभियानाचा प्रारंभ केला. एक आठवडा अर्थात् स्वातंत्र्य दिनापर्यंत चालणार्या या देशव्यापी मोहिमेमुळे कोरोनाविरोधी लढ्यात मोठी बळकटी मिळणार आहे.
राजघाट येथील गांधी स्मृती व दर्शन समाधी येथे महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केली. सोबतच, राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचाही शुभारंभ केला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लहान मुलांना त्यांनी यावेळी संबोधित केले. भौतिक दूरता नियमांचे पालन करा आणि नियमितपणे मुखाच्छादनाचा वापर करा, असे आवाहन त्यांनी मुलांना केले.
आज मी येथे कचरामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ करीत आहे. हे अभियान स्वातंत्र्य दिनापर्यंत चालेल. विचार करा, कोरोनासारख्या महामारीने जर 2014 पूर्वी आपल्या देशात थैमान घातले असते, तर काय झाले असते. त्यावेळी शौचालयांचा प्रचंड अभाव होता. अशा स्थितीत आपण कोरोनावर प्रभावीपणे आळा घालू शकलो असतो का, तेव्हा देशातील 60 टक्के जनतेला उघड्यावर शौचासाठी जाणे भाग पडत होते, त्या स्थितीत टाळेबंदीचे काटेकोर पालन करता आले असते का, असा सवाल पंतप्रधानांनी केला.
आज आपण सर्वच जण कोरोनाच्या महामारीविरोधात लढा देत आहोत. या सात दिवसांच्या कचरामुक्त भारत अभियानामुळे कोरोनाविरोधी लढ्याला आणखी बळकटी मिळणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:
Post a Comment